मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

श्रद्धांजली कार्यक्रम

                             श्रद्धांजली कार्यक्रम 

१ 
हेमंत देव 

     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत अनंत उपाख्य बाळ देव  यांचे ११ जुलै रोजी दुखः द निधन झाले . केपे तालुक्यातील ते ज्येष्ठ संघ कार्यकर्ते होते . मूळ रिवण गांवचे रहिवासी असलेले देव सद्या शिरवई गावात राहात होते . सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ते प्रशिक्षक म्हणून नोकरी करीत होते . संघाचे कार्य करण्यास कठीण अशा केपे तालुक्यात संघाचे काम रुजविण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता . कसलीही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणे हे कठीणच आणि असे निरपेक्ष काम दीर्घकाळ करणे हि तर तारेवरची कसरत . ' श्रेयाचा मज नको लेशहि, निर्माल्यात विरावे ' असे संघगीतात म्हटले जाते . हेमंत देवांनी संघाचे  काम अंतिम श्वासापर्यंत केले .
      केपे तालुक्याचे कार्यवाह म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पहिले . भरपूर वाचन हे त्यांचे वैशिष्ट्य होते . संघाच्या बौद्धिक विभागात ते नेहमी कार्यरत असत . त्यांच्या अकाली निधनाने संघाकामाची मोठी हानी झाली आहे . हेमंत देवांच्या कार्याचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करण्यासाठी केपे तालुक्याने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे . रविवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता उत्कर्ष हायस्कूलमध्ये  श्रद्धांजली कार्यक्रम होईल .

केशव सेवा साधना - सेवा सागर मधील लेख

                                  केशव सेवा साधना

     १९ डिसेम्बर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजाच्या तावडीतून मुक्त झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य गोमंतकात सुरु झाले. स्वयंसेवकांच्या  परिश्रमाने संघाच्या शाखा वाढू लागल्या. शाखेवर येणारा संघाचा स्वयंसेवक समाजाचा विचार करु लागला .  समाजाचा विचार करताना सामाजिक समस्या त्याच्या समोर येऊ लागल्या . या समस्या सोडविण्यासाठी सेवाभावी संस्थांची सुरुवात झाली .
     सेवाभावी कार्यकर्त्यांनी छोटी छोटी कामे सुरु केली . हळूहळू समाजाच्या सहकार्याने या कार्यांना व्यापक रूप येत गेले . विद्यार्थी वसतिगृह, रुग्ण्सेवाकेंद्र, रक्त-गटसूची, फिरता दवाखाना, आपत्ती विमोचन निधीसंकलन अशी विविध सेवाकार्ये हळूहळू सुरु झाली .  या सगळ्या संस्थांना सुसूत्रता यावी असा विचार पुढे आला. त्यातूनच  मध्यवर्ती अशा ' केशव सेवा साधना ' या संस्थेचा जन्म झाला. श्री . लक्ष्मण वामन तथा नाना बेहेरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साधना काम करू लागली . संस्था स्थापन होताच कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका होऊ लागल्या. सेवाभावी कार्यकर्ते घडू लागले.
     परतंत्र गोव्यात काणकोण, सांगे, सत्तरी, पेडणे हे तालुके म्हणजे नव्या  काबिजादी . हिंदू बहुल असलेल्या . पोर्तुगीजांनी या तालुक्यांना सुधारणांच्या बाबतीत जाणीवपूर्वक मागे ठेवले . शिक्षणाच्या सोयी  अपुऱ्या ठेवल्या . साहजिकच अनेक मुले शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जात . तिथे खोली करून रहात .  अत्यंत दुर्गम गावातील मुलांना तर अन्य पर्यायच नसे . काणकोण तालुक्यातील स्व. मंजुनाथदास कामत, स्व. नारायण गांवकर काही शिक्षकांसमवेत पोन्डिचेरी मधील श्रीअरविंद आश्रमात गेले होते . तेथील सेवाकार्ये बघत असताना त्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आठवण आली . तेथील विद्यार्थी वसतिगृह हि कल्पना त्यांना आवडली . काणकोणला आल्यावर सहकारी शिक्षकांशी विचारविनिमय केला गेला . आणि   माताजी मंदिर विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना झाली .
     ' हीनं दूषयति इति हिंदू ' अशी हिंदुसमाजाची एक व्याख्या सांगितली जाते . हीन, वाईट गोष्टींचा त्याग करणारा तो हिंदू . अशिक्षा, अज्ञान, गरिबी यांचा त्याग करणारा तो हिंदू . चांगले निर्माण करायचे म्हणजे वाईट आपोआप दूर होईल . २५ विद्यार्थी संख्या घेऊन वसतिगृह सुरु झाले . केशव सेवा साधनेच्या स्थापनेनंतर माताजी मंदिरातील विद्यार्थी संख्या वाढू लागली . भाड्याने घेतलेली इमारत अपुरी पडू लागली . साहजिकच स्वतंत्र इमारतीचा विचार सुरु झाला . कार्यकर्त्यांचा उत्साह, सेवेप्रती असलेली समाज सदिच्छा, तसेच सरकारी मदत यांच्या सहकार्याने वसतिगृहाची स्वतःची भव्य वास्तू उभी झाली . तेंबेवाडा येथे उभ्या राहिलेल्या या वास्तूत आज ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना मल्लखांब क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली आहेत .  वसतिगृहाला  सरकारच्या  समाजकल्याण खात्याकडून बस देण्यात आलेली असून उल्लेखनीय म्हणजे याच वसतिगृहातून शिक्षण घेतलेले श्री . श्रीकांत गांवकर आज तेथे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत .
     ' सेवा परमो धर्मः ' असे म्हणत सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या माताजी मंदिरात विद्यार्थी संख्या वाढू लागली . परिणामी पैगीण गावात नव्या वसतिगृहाचा विचार सुरु झाला . श्री . विद्याधर पेडणेकर यांनी आपले जुने घर वसतिगृहासाठी दिले . गावातील लोक या मुलांसाठी धान्य किंवा निधी या स्वरुपात मासिक मदत देऊ लागले . फोंडा येथील श्रीरामकृष्णविवेकानंद सेवा समितीच्या महिला ' अमृतसुरभी ' योजनेतून रोज एक मूठ धान्य वसतिगृहासाठी जमा करू लागल्या .  हळूहळू स्वतःच्या वास्तूचा विचार सुरु झाला . सुदैवाने सौ . माणिक प्रभू गांवकर व श्रीमती मिलन प्रभू देसाई या भगिनींच्या सहकार्याने जमीन उपलब्ध झाली . आराखडा तयार होताच कार्यकर्त्यांनी देणगी जमा करायला सुरुवात केली . आणि केशव सेवा साधनेची पहिली इमारत ' श्रीपरशुराम विद्यार्थी वसतिगृह ' या रूपाने उभी राहिली . आज या वसतिगृहात ५४ विद्यार्थी शिकत आहेत .
     २ ऑक्टोबरला काणकोण तालुक्यात प्रचंड पूर आला . जणू ढगफुटीच  झाली . सगळ्या नद्या नाले अस्ताव्यस्त पाणी घेऊन वाहू लागले परिणामी अर्धा तालुका पुराच्या पाण्यात बुडाला . घरेदारे वाहून गेली . लोकांचे संसार उघड्यावर पडले . असल्या अस्मानी संकटाची यत्किंचितही सवय नसलेला हा तालुका हतबुद्धच झाला . अश्या वेळी आपल्या वसतीगृहानी केलेली मदत सगळ्यांना मायेचा आधार देऊन गेली . संपूर्ण गोव्यातून येणारी मदत योग्य रित्या संचालित करायचे काम श्रीपरशुराम विद्यार्थी  वसतिगृहाने  केले . या तालुक्याला भेट द्यायला येणारे कार्यकर्ते , डॉक्टर समाजसेवक यांना सहाय्य केले. या काळात हे वसतिगृह केशव सेवा साधनेचे जणू मुख्यालय बनले होते . स्थायी स्वरूपाचे कार्य म्हणून मग पूरग्रस्तांना घरे बांधून देण्याचा विचार पुढे आला आणि पूर्ण ४ घरांची बांधणी साधनेने समाजाच्या सहकार्याने पूर्ण केली .
   डिचोली तालुक्यात एक सेवा बैठक घेण्यात आली . चर्चा चालू असताना सगळ्यांच्या लक्षात आले कि डिचोली तसेच आजुबाजुच्या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येत मतीमंद मुले आहेत. या  विशेष मुलांसाठी जवळपास शाळा उपलब्ध नाही. एकतर पर्वरी येथील संजय स्कूल किंवा फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठान शाळा. मुलांना तिकडे नेणे आणणेही तसे कष्टाचे, खर्चाचे व जिकीरीचे. कार्यकर्त्यांच्या मनात विशेष  शाळा सुरु करण्याचा विचार आला. प्रारंभिक तयारी म्हणून डिचोली व आजुबाजूच्या गावांमध्ये सर्वेक्षण सुरु करण्यात आले. सर्वेक्षणाचे आलेले इतिवृत्त  कार्यकर्त्यांना अस्वस्थ  करणारे होते. विशेष शिक्षणाची सोय नसलेली  व पुनर्वसनाची गरज असलेली ३०० मुले तिथे होती. समाजाप्रती संवेदनशील असलेले साधनेचे कार्यकर्ते अंतर्मुख झाले.
      विशेष शाळा सुरु करण्याचा  त्यांनी निश्चय केला. मतिमंदत्व हा रोग नाही. ती एक कायम राहणारी अवस्था आहे. आईवडील, शिक्षक व समाज यांच्या सहकार्याने यांत थोडी सुधारणा होते. मतिमंदत्व असलेली व्यक्ती स्वतःच्या  पायावर उभी रहाते. तिचे परावलंबित्व  कमी होते. आत्मविश्वासात वाढ होते. विशेष शाळेचे या प्रक्रियेत मोलाचे  योगदान  असेल. हे एक प्रकारचे उपचारकेंद्र  होईल. औषधोपचारा बरोबर  मतीमंद मुलांची शारीरिक  व  मानसिक   अवस्था  येथे  सांभाळली  जाईल.  प्रशिक्षण देणारा   प्रशिक्षित  शिक्षक वर्ग  या  विशाल  मानवी  जाणीवेतून  काम  करेल. आत्मीय   जिव्हाळा  आणि  सामाजिक  तळमळ  यांचे  हे  प्रतिक बनेल.   
     डिचोलीतील लोकप्रिय दंतवैद्य डॉ. गुरुप्रसाद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली. निधी जमू लागला. २००४ मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर  शाळेची स्थापना करण्यात आली. सौन्स्थेचे  एक हितचिंतक श्री. सद्गुरू शेट्ये यांच्या जागेत ११ विद्यार्थ्यांनिशी  पहिला वर्ग सुरु झाला. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. विशेष  विद्यार्थांच्या  विद्यादानाचे  काम  तसे  कठीण. या कामाची परिणामकता वाढवायची असेल तर स्वतःची इमारत हवी.  शैक्षणिक प्रयोग  राबविणे, वैद्यकीय सुविधा  पुरविणे, स्वयं   रोजगार   प्रशिक्षण केंद्र सुरु करणे,  पालक प्रबोधन बैठका आयोजित  करणे, स्वाभाविकपणे स्वतंत्र  इमारतीचा विचार सुरु झाला.             अथक कार्यश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्वअश्राप पिलांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांचे पालकत्वआणि संवेदनशील दात्यांचे दानशूर दातृत्व अशी त्रिसूत्री घेऊन संस्थेने  वाटचाल सुरु केलीइमारतीचा विचार पुढे येताच  जागेची पाहणी सुरु झाली. श्री झांट्ये बंधू पुढे आले आणि २६०० चौ.मी. जागेचे दानपत्र त्यांनी विश्वस्थांच्या हाती दिले. कार्यकर्त्यांना हुरूप आला आणि अल्पावधीत इमारतींची उभारणी सुरु झाली. काही वर्षां पूर्वीसारखा  निधी हा आता कठीण विषय उरलेला नाही. मागणारा कार्यकर्ता जर विषयाप्रती प्रामाणिक असेल तर निधी हवा तेवढा उपलब्ध होतो. समाजातील सर्व थरातील लोकांनी वस्तुरूप व रोख देणग्यांचा ओघ सुरु केला. विशेष विद्यालयाची स्वतंत्र इमारत तयार झाली. आज केशव सेवा साधना संचालित ' विशेष शाळा ' स्वतःच्या सुसज्ज  वास्तुत सुरु आहे.
         मतीमंद मुलांमध्ये विविध पात्रता असतात. विशेष शाळेचे  कार्य  म्हणजे या मुलांच्या विशेषता शोधून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकविणे. शाळेचा  प्रशिक्षित  शिक्षकवर्ग  हे  काम  आत्मीयतेने  करताना दिसतो आहे. स्वतःच्या शरीराची स्वच्छता राखणे,  स्वतःची  कामे स्वतः करणे, छोट्या छोट्या गोष्टी करावयास लागणे, रस्त्यावरून आत्मविश्वासाने चालणे, दुकानात जाऊन सामान खरेदी करणे,  साधे-सोपे खेळ खेळणे, अक्षर ओळख  करवून घेणे, सोप्या वस्तू तयार करणे, करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणे अशी कामे हे विद्यार्थी  करीत असतात. शाळेत मुलांना खेळ, व्यायाम शिकविला जातो. प्राणायामाचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष मुलांच्या शाळेत पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एका कार्यशाळेचे  आयोजन करण्यात येते. त्यांना एकूण अभ्यासक्रम व शाळेतील इतर कार्यपद्धती याविषयी माहिती दिली जाते.
   पालक शिक्षक समन्वय अंतर्गत प्रशिक्षण, कार्यशाळा घेतल्या  जातात. 
शाळेत या शैक्षणिक वर्षी १४१ विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापिका सौ. केतकी खानोलकर सेवाभावी वृत्तीने शाळेच्या प्रशासकीय व अन्य आवश्यक बाबी सांभाळीत आहेत. एकूण कर्मचारी संख्या ३८ असून शिक्षकांचा उत्साह व कर्मचारी वर्गाची कार्यातील तत्परता यामुळे शाळा वेगाने वाटचाल करीत आहे. एथेन्स येथे झालेल्या उन्हाळी विशेष मुलांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला . २०११ मध्ये देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अश्या ' बालश्री पुरस्कार २०११ ' मध्ये कु . विभा काणेकर हिला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला .
     कार्यकारी मंडळाची सक्रियता पाहता येत्या काही कालावधीत संस्था एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला येईल यात शंका नाही. गेल्या वर्षी पासून वाळपई येथे आणि एक विशेष शाळा सुरु करण्यात आली आहे . प.पू. श्रीगुरुजी म्हणाले होते, ' जनतेमध्ये जनार्दन पाहण्याची श्रेष्ठ दृष्टी हीच आमच्या राष्ट्र कल्पनेचे हृदय आहे. या दृष्टीमुळेच समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या दिव्य अशा पूर्ण रूपाचा अंश पाहण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. '
     गोव्यातील सांगे हा तालुका अत्यंत दुर्गम . वेर्ले , साळजिणी ,तुडव या गावात तर प्राथमिक शाळाही नाही . त्यामुळे साधनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्रावालीला वसतिगृह सुरु करण्याचा विचार केले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्धापनदिनी ३ जून २००१ रोजी स्थानिक देवता श्रीदुर्गामाता विद्यार्थी वसतिगृह ' नावाने वसतिगृहाची सुरुवात करण्यात आली . कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांती विनावापर पडून असलेली एक इमारत सरकारने संस्थेला दिली . संस्थेचे कार्यकर्ते ,हितचिंतक , विद्यार्थ्यांचे पालक हे धान्य ,भाजीपाला , वस्तू , रोख या स्वरुपात मदत देऊ लागले . रिवण , केपे , सावर्डे अश्या शेजारील गावांनीही या मदतीत आपला वाट उचलला . आज ३४ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत .
     आपली कोंकणपट्टी तशी भरपूर पावसाची . पण हा पाऊस वाहून समुद्राला मिळणारा . परिणामी उन्हाळ्यात पाणी टंचाई . फोंडा तालुक्यातील सावईवेरे भागात बोणये वाड्यावर अशीच पाणी टंचाई . सर्वेक्षण केल्यावर तेथे असलेली बुजलेली तळी लक्षात आली . साधनेने श्रमसंस्कार शिबिराची योजना केली . मे महिन्यात झालेल्या या शिबिरात सकाळी खोदकाम , नंतर गावाचे सर्वेक्षण , संध्याकाळी व्याख्याने असा कार्यक्रम आखला . २७५ चौ . फुटांचे ६ फुट खोल तळे सर्वांनी खोदले . गावाने दिलेले सहकार्यही वाखाणण्याजोगे होते .
     सेवेच्या ह्या वेलुला आज अनेकानेक फागोरे फुटलेले असून विविध समस्यांचे समाधान करीत आज तो पुढे जात आहे . समाजाची वाचनाची गरज लक्षात घेऊन श्रीस्थळ येथे श्रीमल्लिकार्जुन वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे . या वाचनालयात आजच्या घडीला उत्तमोत्तम पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत . म्हापसा येथे मेधा पर्रीकर रुग्ण सेवा केंद्राच्या वतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे . अत्यल्प दरात ती आज गरजुना सेवा देत आहे . सत्तरी तालुक्यातील वैद्यकीय अपुरेपणाची जाणीव लक्षात येताच ग्राम आरोग्य रक्षक योजना सुरु करण्यात आली . प्रथमोपचाराचे शिक्षण घेतलेले आरोग्य रक्षक गावात सेवा देत आहेत . पैगीण गावातील लोकांसाठी लीलाताई चि . गोखले आरोग्यकेंद्र साधनेने सुरु केले . छोट्या छोट्या आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक रुग्ण या आरोग्यकेंद्रात येत असतात .
     याशिवाय वेळोवेळी तत्कालीन व्यवस्था म्हणून अनेक कामे साधनेने गोव्यात उभी केली आहेत . फिरता दवाखाना , रुग्णोपयोगी साहित्य केंद्र , प्रथमोपचार पेट्या श्रमसंस्कार शिबिरे , निःशुल्क वैद्यकीय चिकित्सा शिबिरे , रक्तदान शिबिरे , रक्तदाता सूची , अभ्यासिका , बालवाड्या , बाल संस्कार केंद्रे चालविली जातात .
     समाजावर जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा केशव सेवा साधना आधार म्हणून उभी राहिली आहे . मराठवाड्यातील भूकंप , आंध्रप्रदेशातील वादळ , कारगिल युद्ध , गुजरात्त भूकंप तसेच मडगावातील नव्या बाजारातील आग , डिचोलीमधील पूर , काणकोण पूर अशा प्रत्येक वेळी साधनेने निधी गोळा करणे , प्रकल्प उभा करणे अशी कामे केली आहेत . गुजरात मधील नागरपाल गावी कन्या शाळेसाठी ८ खोल्यांचे बांधकाम साधनेने करून दिले आहे .
     माणसाला शिकविणे , मोठे करणे , त्याच्या योगक्षेमाची चिंता वहाणे हि सगळी कामे खरे म्हणजे समाजच करतो . त्याच्या ठिकाणी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी त्याला देतो . वृक्ष जसा आपली फळे आपण खात नाही तसा हा माणूसही समाजाकडून मिळालेल्या संपत्तीचा भाग पुन्हा समाजाला देतो . अशा माणसांची संख्या जितकी अधिक तितका तो समाज संपन्न , अधिक मोठा . अश्या समाज निर्मितीची साधना हीच केशव सेवा साधना .